नवी मुंबईत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नेरूळमध्ये राहणाऱ्या महिलेवर २०१९ पासून उपचार सुरू होते. मात्र, उपचार करूनही प्रकृतीत काही फरक न पडता तब्बल तीन कोटी रुपये खर्चून गेले, त्यामुळे महिलेच्या मुलाने थेट पोलिस ठाणे गाठले आहे. कुटुंबाकडून दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला महिलेला काही आजाराची लक्षणे दिसली होती. वैद्यकीय तपासणीनंतर उपचार सुरू झाले. त्याचदरम्यान पालघरमधील काही व्यक्तींनी “आम्ही आजार बरा करू” अशी हमी दिली आणि त्यांच्या मार्फतच २०१९ पासून उपचार सुरू झाले. मात्र, हे उपचार औषधोपचाराचे होते की मंत्र-तंत्रावर आधारित होते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
तक्रारीनंतर गुन्हा दाखल दरम्यान, लाखो-कोट्यवधी रुपये खर्चूनही महिलेच्या तब्येतीत सुधारणा झाली नाही. यावरून मुलाने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. संबंधित व्यक्तींविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून, त्यांनी तक्रारदाराला धमकी दिल्याचाही आरोप आहे. पोलिसांसमोर मोठं आव्हान उपचाराच्या नावाखाली फसवणूक झाल्याचा हा बहुतेक पहिलाच गुन्हा असू शकतो. यामुळे पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. गुन्हेगार सराईत आहेत की खरोखर उपचार करणारे? औषधोपचाराचा आडोसा घेतला गेला की मंत्र-तंत्राचा? हे तपासणं आता पोलिसांसाठी अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे.
