पुणे संपादक : बापु फुंदे
वाहतूक कोंडी, दुचाकीस्वारांचे मृत्यू या लौकिकाबरोबरच आता पादचाऱ्यांच्या वाढत्या मृत्यूंनी पुणे शहराची प्रतिमा आणखी चिंताजनक झाली आहे. या वर्षीच्या (जानेवारी ते जुलै) पहिल्या सात महिन्यांत तब्बल ६० पादचाऱ्यांना जीव गमवावा लागला आहे. म्हणजे सरासरी प्रत्येक तीन ते चार दिवसांनी एक पादचारी रस्ते अपघातात मृत्युमुखी पडतोय. २०२४ मध्ये पुण्यातील रस्ता अपघातांत एकूण ३२० मृत्यू नोंदवले गेले होते, त्यातील मोठा वाटा पादचाऱ्यांचा होता. रस्त्यांवरील मूलभूत सुविधांचा अभाव आणि वाहनचालकांची बेफिकिरी यामुळे ही भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. अलीकडच्या दोन दिवसांत झालेल्या अपघातांत तिघांचा मृत्यू झाला. लोहगावमधील हवाई दलाच्या वसाहतीत दोन वर्षांच्या चिमुकल्याला भरधाव मोटारीने चिरडले. शिवाजी रस्त्यावरील राष्ट्रभूषण चौकात भरधाव वाहनाने दुचाकीस्वाराचा जीव घेतला. तर सोलापूर रस्त्यावर शेवाळवाडीत रिक्षाच्या धडकेत पादचारी नारायण सूर्यवंशी (३६) मृत्युमुखी पडले. अपघातानंतर रिक्षाचालक पसार झाला.शहरातील वारजे, नगर रस्ता, सोलापूर रस्ता आणि नवले पूल हे पादचाऱ्यांसाठीचे ‘डेथ स्पॉट’ ठरत आहेत. महामार्गावर रात्री रस्ता ओलांडताना, तसेच उपनगरांमध्ये भरधाव वाहनांच्या धडकांमुळे मृत्यूंची मालिका सुरूच आहे.
पुण्यातील पादचारी सुरक्षेची परिस्थिती अत्यंत भयावह आहे. शहरातील पदपथ अतिक्रमणाने व्यापलेले आहेत. झेब्रा क्रॉसिंग, पादचारी सिग्नल, ओव्हरब्रिज यांचा अभाव आहे. फेरीवाले, बेकायदेशीर पार्किंग, खांब, झाडे व तुटलेले पदपथ यामुळे नागरिकांना रस्त्यावरून चालणे भाग पडते आणि तेथूनच मृत्यूच्या सावटाखाली प्रवास करावा लागतोतज्ज्ञांच्या मते, पुणे महापालिका, वाहतूक पोलिस, सामाजिक संस्था आणि रस्ता सुरक्षा तज्ञांनी एकत्र येऊन ठोस उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे. पदपथावरील अतिक्रमण हटवणे क्रॉसिंग ठिकाणी पादचारी ओव्हरब्रिज किंवा सिग्नल उभारणे वाहनचालकांनी वेग मर्यादा पाळावी वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन तसेच जनजागृती मोहिम राबविणे हे उपाय राबवले तरच पुण्यातील पादचारी सुरक्षेला न्याय मिळू शकेल, अन्यथा रस्त्यांवरील मृत्यूची ही साखळी सुरूच राहणार आहे.
