२७ सप्टेंबर – २ ऑक्टोबर दरम्यान होणार भव्य आयोजन सोलापूर : ‘सोलापूर सोशल फाउंडेशन’च्या पुढाकाराने येत्या २७ सप्टेंबर जागतिक पर्यटन दिनापासून ते २ ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीपर्यंत भव्य ‘सोलापूर जिल्हा पर्यटन महोत्सव २०२५’ आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाच्या लक्षवेधी लोगोचे अनावरण नुकतेच सोलापुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.
माजी वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांच्या संकल्पनेतून हा महोत्सव साकारला जात असून, सोलापूर जिल्ह्याच्या पर्यटनाचा सर्वांगीण विकास हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे. या माध्यमातून ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक, निसर्ग व ग्रामीण पर्यटनाचा प्रचार व प्रसार होणार आहे.
‘५-पी’ मार्केटिंग ब्रँडिंगची संकल्पना या महोत्सवाचे स्वरूप खास ‘५-पी’ मार्केटिंग ब्रँडिंग या तत्त्वावर आधारले गेले आहे. यात –
Places (ठिकाणे)
Personalities (व्यक्तिमत्त्वे)
Products (उत्पादने)
Placement (बाजारपेठ)
Pollution Free Environment (प्रदूषणमुक्त वातावरण)
या पाच महत्त्वाच्या घटकांवर महोत्सवाचे आयोजन केंद्रित असेल.
मान्यवरांची उपस्थिती लोगो अनावरण सोहळ्याला पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, आमदार समाधान आवताडे, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे आदी मान्यवर उपस्थित होते. पर्यटनाला नवे व्यासपीठ या महोत्सवामुळे जिल्ह्याच्या पर्यटन क्षमतेला नवे व्यासपीठ मिळणार असल्याचे सुभाष देशमुख यांनी सांगितले. “यातून ग्रामीण व शहरी अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये पर्यटनाविषयी जागरूकता वाढेल. स्थानिक उद्योग, स्वयं-सहायता गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळेल, रोजगार निर्मितीला गती मिळेल आणि सोलापूर पर्यटनाचा ब्रँड राज्यभर व देशभर उंचावेल,” असे ते म्हणाले.
