मुंबई : राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. मात्र, या प्रक्रियेसाठी उपलब्ध करून दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर (https://ladakibahin.maharashtra.gov.in) तांत्रिक अडचणींमुळे महिलांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. वेबसाईट लिंक ओपन न होणे, ओटीपी न येणे, वारंवार एरर दाखविणे अशा समस्यांमुळे अनेक बहिणी नाराजी व्यक्त करत आहेत. सरकारने दोन महिन्यांची मुदत दिली असून, ठरलेल्या वेळेत ई-केवायसी पूर्ण न केल्यास १५०० रुपयांची मासिक आर्थिक मदत थांबण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रक्रिया सोपी करण्याचा दावा शासनाकडून करण्यात आला असला तरी प्रत्यक्षात तांत्रिक त्रुटींमुळे महिला त्रस्त आहेत,” असे लाभार्थ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, शासनाने स्पष्ट केले आहे की ही प्रक्रिया पारदर्शकता राखण्यासाठी असून फक्त आधार क्रमांकाद्वारेच पडताळणी केली जाणार आहे. तरीसुद्धा महिलांची चिंता वाढली असून, लवकरच तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी होत आहे.
